
सेलू शहराच्या राजकारणात बदलाची नांदी म्हणून ओळखली जाणारी ही नगरपालिका निवडणूक, आता “नव्या ऊर्जेच्या” नव्हे तर “जुन्या विचारांच्या” परंपरेच्या कचाट्यात अडकलेली दिसते.
युवकांमध्ये जोश आहे, इच्छाशक्ती आहे, पण जागा? जागा मात्र जुने नेते आणि त्यांचे ‘गट’ सोडायला तयार नाहीत.
गेल्या आठ–नऊ वर्षांपासून युवक ‘संधी’ या शब्दाची वाट बघतोय — पण ती दरवेळी जुन्या विचारांच्या दारावरच अडकते. नवीन ऊर्जा, नवीन प्रणाली, नवीन दृष्टिकोन या सगळ्याची चर्चा केली जाते, पण उमेदवारी मात्र त्याच जुन्या ‘सर्कल’मधून फिरते.
स्वाभिमानी आणि वैचारिक विचारांची सेलू सध्या राजकारणाच्या दलदलीत कुठेतरी हरवली असं पाहायला दिसत आहे

पैशाचा प्रभाव, गटबाजीचा गंध, आणि राजकारणात ‘मीच सर्व’ ही मानसिकता – या तिघांनी मिळून सेलूतील तरुण राजकारणाचा गळाच घोटला आहे.
प्रभागांमध्ये काम करणारे, लोकांमध्ये मिसळलेले, खऱ्या अर्थाने सेवाभावी युवक — हे सगळे फक्त ‘लाईक’ आणि ‘शुभेच्छा’पर्यंतच मर्यादित राहिले आहेत.
“नवीन पिढीला संधी नाही, मग ते राजकारण कशासाठी शिकतात?”
“पैशाशिवाय राजकारणात पाऊलच टाकता येत नाही, मग सेवाभाव कुठे गेला?”
अशा प्रश्नांची कुजबुज आता थेट जनतेतून ऐकू येते.
जर या वेळेसही युवकांच्या हातून ही “संधीची वेळ” निसटली —
तर पुढच्या निवडणुकीपर्यंत त्या उत्साहाचं ‘तारुण्य’ टिकेल का,
की पुन्हा जुने नेतेच “अनुभवाचं राजकारण” म्हणत मैदानात उतरतील,
हा प्रश्न प्रत्येक सेलूकराच्या मनात आहे.
आणि मग शेवटी एकच वाक्य लोकांच्या ओठावर उमटतं
“सेलू बदलायचं म्हणतोय, पण सेलूच्या विचारांना राजकारण बदलू देत नाही!”