
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त शेलू शहरात उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. रायगड कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या मार्गावरून ही भव्य मिरवणूक मार्गस्थ झाली. ढोल-ताशांचा गजर, भगवे ध्वज आणि शिवमय वातावरणात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.

यावेळी शेलू शहरातील सह्याद्री मित्र मंडळातर्फे मिरवणुकीत सहभागी विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. उन्हाची तीव्रता लक्षात घेता सुमारे दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना “रसना” थंड पेयाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून मित्र मंडळाच्या या सामाजिक जाणीवेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

या उपक्रमात भारत डख, सतिश आकात, सागर वावरे, ज्ञानेश्वर डख, गणेश काचेवर, रामप्रसाद डख, महेश भुजबळ, प्रसाद काचेवार, आमेर शेख, राहुल डोंबे, प्रताप रघुवंशी, गणेश बागल व सर्व मित्र परिवाराचा सक्रिय सहभाग होता.शिवजयंती निमित्त केवळ उत्सव साजरा न करता सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला असून सह्याद्री मित्र मंडळावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.