
“जय जगन्नाथ, जय श्रीराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमला
सेलू जि.परभणी : परभणी, सेलू, बुलडाणा आणि रिसोड येथील भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम येथे स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथेला शुक्रवारी, २६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजता इंद्रद्युम्ननगरीमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. १ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार्या या कथा सोहळ्याचे आयोजन आयोजक राधेश्याम चांडक (बुलडाणा), नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ. विनोद मंत्री (परभणी) आणि नंदकिशोर बाहेती (सेलू) आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने शुक्रवारी दुपारी चार वाजता श्री शिवमंदिर ते कथा स्थळा पर्यंत ग्रंथ, मंगल कलश आणि रथातून स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. “जय जगन्नाथ, जय श्रीराम” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
या मिरवणुकीत भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला. पुरुष पांढरा कुर्ता पायजमा आणि महिला चुनरी साडी परिधान करून या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. स्वामीजींच्या हस्ते धर्मध्वजारोहण पारंपारिक पद्धतीने स्वामीजींचे औक्षण करण्यात आले. ग्रंथपूजनानंतर स्वामीजींचे पूजन झाले. आरती झाली. प्रास्ताविकातून राधेश्याम चांडक यांनी सात दिवसांच्या कथेतून स्वामीजींनी सांगितलेल्या कथासूत्रातील विचारांचे मनन, चिंतन भाविकांनी करावे तसेच हिंदू धर्म जागृतीच्या सत्कार्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन केले. स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले, ” श्रीमद् भागवत महापुराण कथा जगन्नाथ धाममध्ये श्रवण करणे हे परम भाग्याची पराकाष्ठा आहे. ध्यानमग्न होऊन कथेत लीन होऊन कथा श्रवण करावी, जीवनाच्या उन्नतीसाठीचा सार श्रीमद् भागवत महापुराण कथेतून श्रवण करावा आणि त्याचे आचारण करीत जीवन साफल्य साधावे.” सूत्रसंचालन कांचन बाहेती यांनी केले. कथेला पुरुष, महिला श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती.

मराठवाडा आणि विदर्भातील भाविकांच्या वतीने श्रीक्षेत्र जगन्नाथ पुरी धाम मध्ये राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांच्या श्रीमद् भागवत महापुराण कथेला शुक्रवारी सायंकाळी उत्साहात सुरुवात झाली.