
देशपातळीवर चर्चेत आलेल्या वाल्हूर येथील सर्पिलाकार बारवेच्या जतन व संवर्धनाचे काम सेवावर्धिनी संस्थेने हाती घेतले आहे. ही संस्था मराठवाड्यातील दुष्काळी भागात जलसंवर्धनाची कामे करणार असून वालूर येथील बारवांचे संवर्धन सुशोभिकर हा त्याचाच एक भाग आहे. संवर्धनाचे काम तिन टप्प्यात होत असून बांधकामासाठी खास देगलूर येथून दगड मागविण्यात आला आहे.पहील्या टप्प्यातील काम जवळपास
पुर्णत्वाकडे गेले आहे.
साध्या पद्धतीने शुभारंभ
कुठलाही गवगवा न करता विकास कामाचा शुभारंभ गावचे सरपंच संजय साडेगांवकर, गणेशराव मुंडे,शैलेश तोष्णीवाल,मारोतराव बोडखे, वाल्मिक दराडे,गोपाळ अबूज,गणेशराव खरबे,बाजीराव बोडखे,राजेश साडेगांवकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आले.शिल्पकारांची टीम वालूरमध्ये दाखल झाली आहे.
संस्थेची कार्यपद्धती…
१९९८ साली रास्व.संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या. ही संस्था समाजातील दुर्बल घटकांना सबल करून मुख्य प्रवाहात आणण्याचे कामे, समाजाच्या गरजेची कामे केली जातात. यातील कोणत्याही कामासाठी सेवावर्धिनी शासनाकडून व शासनाच्या कोणत्याही अभीकरणा कडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही. वेगवेगळ्या कंपन्यांच्या आर्थिक सहाय्यावर अशी कामे केली जातात.
राज्यातील १७ बारवाचा कायापालट
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिसऱ्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने “अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्प” सेवावर्धिनी राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या पश्चिम महाराष्ट्रातील १७ बारवांचे जतन संवर्धन करण्यात आले आहे. वालूरच्या निमित्ताने संस्थेने आपले कार्यक्षेत्र विस्तारित केले आहे.पोस्टखात्याने टपाल तिकिट काढून सन्मानित केलेल्या वालूरच्या बारदानी बारवेचेही कांम लागोलाग सुरू होणार आहे. हेलिकल स्टेपवेलचा लोकार्पण सोहळा दिवाळीपूर्वी पालकमंत्री मेघना बोर्डिकर यांच्या उपस्थितीत होणार असून जलपूजन किशोरजी व्यास यांच्या हस्ते होणार आहे.
आणखी दोन गावांचे प्रस्ताव..
परभणी तालुक्यातील आर्वी व सेलू तालुक्यातील रायपूर येथील प्राचिन बारवांच्या पुनर्निर्माणाचे प्रस्ताव संस्थेकडे दाखल करण्यात आले असून रायपूर येथील प्रस्तावाला संस्थेने मान्यता दिली असल्याची माहिती शासनाच्या बारव संवर्धन समितीचे सदस्य तथा समन्वयक मल्हारिकांत देशमुख यांनी दिली.