
सेलू :
शहर व परिसरात शाळा, महाविद्यालय, अभ्यासिका तसेच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर छेडछाडीच्या प्रकारात वाढ होत असल्याने महिलां व तरुणींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यासंदर्भात पोलिस उपनिरीक्षक राऊत सेलू यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, टवाळखोरांमुळे मुली व महिला असुरक्षित वाटत असून, अल्पवयीन जोडप्यांचे प्रमाणही वाढत आहे. यामुळे लहान मुलांवर व समाजावर नकारात्मक परिणाम होत असून, छोट्या भांडणांपासून पुढे मोठी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागण्या पुढीलप्रमाणे:
चिडीमार पथक स्थापन करून टवाळखोरांवर कार्यवाही करावी.
अल्पवयीन जोडप्यांवर तात्काळ नियंत्रण ठेवावे.
सेलू बसस्थानक परिसरात कायमस्वरूपी एक पोलीस कर्मचारी नेमावा.
दोषींवर कडक शासन करावे.
अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या प्रसंगी जयसिंग शेळके, कृष्णा पडघन, अक्षय सोळंके, गणेश शेवाळे, लालू खान, आकाश इघवे, गोविंदा गायकवाड, एकनाथ जाधव आदी उपस्थित होते.