
सुनेत्रा पवार यांच्या विरोधातलं विजय शिवतारे यांचं बंड काही दिवसांआधीच शांत झालं आहे. आता हर्षवर्धन पाटलांचंही समाधान झालंय. मात्र इंदापुरातल्या मेळाव्यात फडणवीसांच्या समोरच हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांकडे बोट दाखवलंय. महायुतीचा धर्म मित्रपक्षांनीही पाळावा, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांचा संघर्ष इंदापुरात नवा नाही. भोरमधून विजय शिवतारेंचं बंड शांत केल्यानंतर, हर्षवर्धन पाटलांच्याही फडणवीसांसोबत बैठका झाल्या. त्या बैठकीत इंदापुरात फडणवीसांचा मेळावा घ्यावा, असं ठरलं. त्यानुसार बारामतीत सुनेत्रा पवारांचा मार्ग सुकर करण्यासाठी फडणवीसांनी इंदापुरात मेळावा घेतला.
ज्या प्रकारे मदतीच्या मोबदल्यात मदतीची अपेक्षा, हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांकडून व्यक्त केली. त्याच प्रकारे ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत अन्याय होऊ नये, असं हर्षवर्धन पाटलांच्या कन्या अंकिता पाटील म्हणाल्या आहेत.
आपल्या कार्यकर्त्यांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल होत, असून कारवाईसाठी येणारे फोन बंद करा हेही हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत. त्यामुळं असे फोन नेमके कोण करतात, अशी चर्चा आता सुरु झालीये. बारामती लोकसभेत एकूण 6 तालुके येतात. त्यात भोरमधून विजय शिवतारेंनी माघार घेतली. आता इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांचंही समाधान झालंय. हर्षवर्धन पाटलांसह इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारत असल्याचं जाहीरपणे फडणवीस म्हणाले आहेत.