
परभणी, प्रतिनिधी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सईद खान यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीत सईद खान यांना २४२ मते मिळाली असून त्यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत विजय संपादन केला.
या निवडणुकीत डॉ. विवेक नावंदर यांना १५९ मते, तर सुशील देशमुख यांना ५६ मते मिळाली. मतमोजणीत ८ मते अवैध ठरली.
या निवडणुकीसाठी एकूण ४६६ मतदार पात्र होते. त्यापैकी ४६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे मतदानाची टक्केवारी अत्यंत उच्च राहिली.
महायुतीचे उमेदवार सईद खान यांच्या विजयामुळे परभणी व हिंगोली जिल्ह्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. समर्थकांनी घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला तसेच एकमेकांना मिठाई भरवून विजयाचा आनंद साजरा केला.
या निकालामुळे परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात महायुतीचे वर्चस्व अधिक बळकट झाल्याचे मानले जात असून आगामी काळातील राजकीय समीकरणांवरही या विजयाचा महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.