
जालना –निम्न दुधना प्रकल्पासाठी पाणी साठविण्याच्या उद्देशाने संपादीत करण्यात आलेल्या जमिनीवर आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या विरोधात धरणग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “आमची जमीन पाणी साठविण्यासाठी घेतली होती. त्या वेळी शासनाने करारनामा करून संपादन केले, मात्र आता त्या जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. हे पूर्णपणे कराराच्या अटींचे उल्लंघन असून शेतकऱ्यांवर अन्याय आहे.”

शेतकऱ्यांनी पुढे नमूद केले की, “पाणी साठविण्याच्या नावाखाली जमीन घेऊन आता त्याच ठिकाणी दुसरा प्रकल्प सुरू करणे हे चुकीचे आहे. सौरऊर्जा प्रकल्पासाठी अधिकारी शेतात येऊन सर्वेक्षण करत आहेत, ज्यास आम्ही तीव्र विरोध करतो. जर शासनाला ही जमीन आवश्यक नसेल, तर ती शासन नियमाप्रमाणे पैसे भरून आम्हाला परत द्यावी.”
याशिवाय शेतकऱ्यांनी नमूद केले की, “आम्ही प्रतिहेक्टर २००० रुपये वार्षिक गाळपेरा भरतो. शासनाने जर त्यापेक्षा जास्त रक्कम निश्चित केली, तरी आम्ही ती भरण्यास तयार आहोत, पण आमची जमीन सौरऊर्जेसाठी वापरू नये.”
शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे ही प्रक्रिया तातडीने थांबविण्याची मागणी केली या निवेदनाद्वारे केली आहे.